नवी दिल्ली: गिलगीट-बाल्टिस्तान या पाक व्याप्त काश्मीरच्या प्रदेशात सार्वत्रिक निवडणुका घेण्यास पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. त्या न्यायालयाच्या निर्णयाला भारताने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. या संबंधात जारी केलेल्या निवेदनात भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, गिलगीट-बाल्टिस्तानचे संपूर्ण जम्मू आणि काश्मीर व लडाख हा भाग भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने या भागावर बेकायदेशीर कब्जा केला असून पाकिस्तानने हा भाग त्वरित मोकळा करावा, अशी मागणीही भारतातर्फे करण्यात आली आहे.
हा भाग पूर्णपणे भारताचा अधिकृत भाग असून त्याचे भारताच्या भूमीशी झालेले संलग्नीकरण हे अतुट आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार किंवा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा या भागावर कोणताही अधिकार नाही. त्यांना असा आदेश देण्याचाही अधिकार नाही असे भारताने म्हटले आहे. आम्ही हा निर्णय पूर्णपणे फेटाळून लावत असून हा भाग पाकिस्तानच्या ताब्यातून सोडवण्यासाठी आमचे अथक प्रयत्न सुरूच राहतील, असेही भारताने म्हटले आहे.
त्यामुळे तेथे निवडणूक घेण्याच्या भानगडीत पाकिस्तानने पडू नये आणि हा प्रदेश भारताच्या हवाली करावा, अशी मागणीही भारत सरकारने केली आहे. गेली सात दशके पाकिस्तानने बळाच्या जोरावर हा भाग आपल्या ताब्यात ठेवला असून तेथील जनतेला त्यांनी स्वातंत्र्य आणि मानवाधिकारही नाकारला आहे, असा आरोपही भारताने केला आहे.