इस्लामाबाद: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळावर पाच अस्थायी सदस्यांची निवड होणार असून त्यात भारताची निवड होणे ही नियमित व सर्वधारण बाब आहे. त्याचा पाकिस्तानच्या हितावर काही विपरीत परिणाम होणार नाही, असे पाकिस्तानचे विदेश व्यवहार मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी म्हटले आहे.
अशिया-पॅसिफीक गटातील एका जागेसाठी भारताचा एकमेव अर्ज असल्याने भारताची निवड ही आता केवळ एक औपचारिकता आहे. ते म्हणाले की, या गटातून प्रत्येक देशाला रोटेशन पद्धतीने सदस्यत्व दिले जात, पाकिस्तानलाही या आधी ही संधी मिळाली होती.
त्यामुळे भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड होणे ही एक साधारण स्वरूपाची बाब आहे असे ते म्हणाले. सुरक्षा मंडळावर अस्थायी सदस्य म्हणून भारत आणि पाकिस्तान यांची प्रत्येकी सात वेळा या आधी निवड झाली आहे, असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.