नवी दिल्ली – भारतीय प्रदेशात घुसण्यासाठी बनवलेल्या भुयार बुजवण्यासाठी भारतीय लष्कर पाकिस्तानी हद्दीत 200 मिटर पर्यंत घुसले, अशी माहिती केंद्र सरकारच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.
भारतीय सुरक्षा दलांनी गेल्या आठवड्यात चकमकीत मारलेल्या दहशतवाद्यांनी प्रवेश केला, त्या भुयाराचे प्रवेशद्वार बुजवण्यासाठी भारतीय फौजा पाकिस्तानी हद्दीत 200 मिटर आत घुसल्या. जम्मू काश्मिरमधील सांबा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेवर हे 150 मीटर लांबीचे भूयार 22 नोव्हेंबर रोजी आढळले होते.
नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मेलेल्या दहशतवाद्याजवळ एक मोबाईल फोन सापडला. त्यामुळे या भूयाराचा ठावठिकाणा समजला. रायझिंग डे च्या समारंभात बोलताना सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या मोबाईल फोनमुळेच या भूयाराची जागा निश्चित झाली. मात्र या कारवाई संदर्भात त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.
सीमा सुरक्षा दल आणि जम्मू काश्मिर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हे भूयार शोधण्यात आले होते. नागरोटरा चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांनी या भूयाराचा वापर करूनच देशात प्रवेश केला असावा. कारण हे भूयार सर्वात नवीन होते. येथे आल्यानंतर त्यांना महामार्गापर्यंत कोणी तरी वाटाड्या सापडला असावा, असे सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक एन. एस. जामवाल यांनी सांगितले.
या भूयारातून बाहेर पडण्याचा मार्ग जंगली गवत आणि माती टाकून व्यवस्थित बुजविले होते. तर या भुयाराच्या तोंडाला पाकिस्तानातील शिक्के असणाऱ्या पोत्यात वाळु भरून ठेवलेली होती. हे भुयार उभारण्यासाठी योग्य त्या अभियांत्रिकीचा वापर केला असावा, असे त्याच्या रचनेवरून दिसत आहे.