नवी दिल्ली – करोनामुळे निर्माण झालेला धोका संपुष्टात आला तर येत्या डिसेंबरमध्ये देशाची मानाची समजली जाणारी इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करता येईल, अशी शक्यता भारतीय बॅडमिंमट संघटनेने व्यक्त केली आहे.
सध्या करोनाचा धोका वाढत असला तरीही येत्या डिसेंबरचा विचार करता तसे अजून 8 महिने हातात आहेत. केंद्र सरकारने क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी परवानगी दिली तरच हे शक्य होईल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरण्याची संधीही मिळणार आहे. ही स्पर्धा मार्च महिन्यात होणार होती. मात्र, करोनामुळे स्पर्धा स्थगित करावी लागली. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या मान्यतेची ही स्पर्धा असल्याने ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीनेही त्याचे महत्त्व जास्त आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये घेण्याबाबत प्रयत्न सुरू होते. मात्र, करोनाचा धोका जरी त्यापूर्वी संपुष्टात आला तरीही इतक्या कमी वेळात स्पर्धा आयोजित करणे शक्य होणार नाही. त्यामुळे डिसेंबरचा पर्याय काढण्यात आला आहे. अर्थात हा निर्णय केंद्र सरकारवर अवलंबून आहे. तसेच लॉकडाऊन संपल्यावर विमान प्रवासाला देखील परवानगी मिळाली पाहिजे.