नवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम रायफलींपैकी एक असणाऱ्या सिग सेउर बनावटीच्या रायफली भारतीय जवानांना या वर्षाअखेर उपलब्ध होतील, आपल्या सीमावर्ती दलांना सशक्त बनवण्याचा भारतीय लष्कराचा नेहमीच प्रयत्न असतो, असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपीम रावत यांनी केले.
फिल्ड मार्शल केएम करिअप्पा स्मृती व्याख्यानात रावत बोलत होते. ते म्हणाले, भारत आणि रशीयाचा संयुक्त उपक्रम असणाऱ्या एक 203 रायफलींच्या उत्पादनाला सुरवात होईल आणि त्यातील पहिला टप्पा या वर्षाअखेर ताब्यात मिळेल. या उत्पादनात कोणताही खंड पडू नये म्हणून लष्करात कार्यरत असणाऱ्या मेजर जनरलची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. अमेठी येथील दारूगोळा कारखान्याचे सीइओ म्हणून ते काम पहात आहेत. अगदी अल्पकालीन सुचनेतही पायदळ कोणत्याही युध्दभूमीवर जाण्यास सज्ज असते. त्यांना सशक्त करण्याची लष्कराची आस आहे. जवानांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक अद्यायावत युध्द सामग्री पुरवून त्यांना सशक्त करता येते, असे लष्कर प्रमुख म्हणाले.
जवानांचे सशक्तीकरण, आत्मविश्वासवृध्दीच्या मार्गावर भारतीय लष्कर आहे. त्यांच्या साधनांनी सुसज्ज करण्याचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग आहे. माणूस नेऊ शकेल असे रणगाडा भेदक क्षेपणास्त्र बनवण्याचा प्रयत्न संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) करत आहे. पायदळातील 100 जवानांना चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण कअकादमीत उभारलेल्या तरूण जवान प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात येणार आहे. तेथे त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर आम्हाला अधिक तरूण अधिकारी उपलब्ध होऊ शकतील, अशी मला आशा आहे.
भारतीय सीमा आणि शेजारी राष्ट्रांच्या सीमा याबाबतची माहिती लवकरच सार्वजनिक दस्तऐवज करण्यात येणार आहे. त्यामुळे जवान आणि नागरिक यांना योग्य माहिती मिळू शकेल. सीमेवर ताठ छातीने उभारणाऱ्या जवानाला कोणत्या सीमेचे तो रक्षण करतोय याची माहिती मिळेल, असे ते म्हणाले.