कवठे येमाईत चोरट्यांचा धुमाकूळ : दोन ठिकाणी चोरी, दूध संकलनातील प्रयत्न फसला
सविंदणे- कवठे येमाई (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि.26) पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी शेतानजीक वस्ती करून राहणाऱ्या घरांना लक्ष्य केले. चोरट्यांनी दाम्पत्यांना मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या एका घरात चोरी केली. तसेच एका दूध संकलन केंद्रात चोरीचा प्रयत्न फसला. एका रात्रीत चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कवठे येमाई येथील गावठाणानजीक फत्तेश्वर रोडला राहणारे नूरमहंमद पठाण (वय 65) व त्यांची पत्नी जैतुन पठाण (वय 60) हे झोपेत असताना घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी त्यांना मारहाण केली. 5 हजार रुपये रोकड व 3 तोळे सोने असा ऐवज लांबविला. नूरमहंमद पठाण यांच्या छातीवर चोरट्यांनी गज मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या पत्नीस ही चोरट्यांनी मारहाण केली. मंचर रोडनजीक शेतात राहणारे प्रकाश गणाजी इचके यांच्या घराची खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत जयवंताबाई व प्रकाश इचके यांना दमबाजी केली.
साहित्यांची उचकापाचक करीत दोन तोळे सोने व रोख रक्कम, असा सुमारे साठ हजारांचा ऐवज पळविला. येथील भारत भोर यांच्या श्रीराम दूध संकलन केंद्रातही चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. एक सीसीटीव्ही कॅमेराही तोडत तेथील ऑफीसचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील मुख्य केबीनमध्ये एकजण झोपल्याचे पाहून चोरटे तेथून पसार झाले. हे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. 5 चोरटे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिरूरच्या पश्चिम भागात चोरट्यांची दहशत पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार पोपटराव गावडे यांनी कवठे येमाईत येत पठाण कुटुंबीयांची भेट घेतली.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा तातडीने छडा न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी दिला आहे. ऐन दिवाळीत झालेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. अद्याप एकाही चोरीतील चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याबद्दल माजी आमदार पोपटराव गावडे,पंचायत समिती सदस्य डॉ. पोकळे, सरपंच अरुण मुंजाळ, माजी सरपंच दीपक रत्नपारखी, बाजीराव उघडे यांनी संताप व्यक्त केला आहे.
- शिरूरच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांत सातत्याने होत असलेल्या चोऱ्या रोखण्यात पोलीस प्रशासनास अपयश येत आहे. नुसतेच गुन्हे दाखल करून जमणार नाही तर पोलिसांनी झालेल्या सर्वच चोऱ्यांचा छडा लावून यातील गुन्हेगारांना तातडीने अटक केली पाहिजे. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने छडा लावावा.
– पोपटराव गावडे, माजी आमदार, शिरूर.