दाओस – भारताची अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढत आहे त्यानुसार भारत 2030 मध्ये जगातील तिसरी अर्थव्यवस्था होईल. सध्या भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. 2030 पर्यंत भारत हा जपान आणि जर्मनीला मागे टाकेल आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर चीन असून त्यांचे स्थान अबाधित राहील. ही माहिती अर्नेस्ट अँड यंग या संस्थेने तयार केलेल्या अभ्यास अहवालात देण्यात आली आहे.
सध्या भारताची अर्थव्यवस्था तीन लाख कोटी डॉलरची समजली जाते. 2047 मध्ये म्हणजे भारताच्या स्वतंत्र्याला 100 वर्षे उलटल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था 26 लाख कोटी डॉलरची (ट्रिलियन) होणार आहे. यामुळे जगातील गुंतवणूकदारांना भारत हा एक आकर्षक गुंतवणूक केंद्र म्हणून पुढे येणार आहे.
इतर देशात राजकीय तणाव आहेत. तशा प्रकारचे तणाव भारतामध्ये नाहीत. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ आहे. भारत सरकारने गेल्या 30 वर्षांत आर्थिक क्षेत्रात बऱ्याच सुधारणा करून उद्योग व्यवसाय करणे सोपे केले.
आगामी काळातील ऊर्जेची गरज पाहता सरकार आणि भारतातील खासगी कंपन्या आगामी काळात नव्या तंत्रज्ञानावर आधारित स्वच्छ ऊर्जेसाठी महत्त्वाकांक्षी योजना आखात आहेत. भारताने रक्कम हस्तांतरणासाठीची डिजिटल अर्थव्यवस्था विकसित केली असून आता भारतातील प्रचंड लोकसंख्या या व्यवस्थेचा वापर करीत आहे.
त्यामुळे इतर विकसित देशापेक्षा भारतातील डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने पुढे गेली आहे. यामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्था अधिक ताकतीने मार्गाक्रमन करणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतात उद्योग व्यवसाय वाढणार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे असे अर्नेस्ट ऍन्ड यंगचे सीईओ कार्माइन डी सीबीओ यांनी सांगितले.
सध्या भारताची अर्थव्यवस्था 3 लाख कोटी डॉलरची आहे. 2035-36 मध्ये ती दहा लाख कोटी डॉलरची होईल. 2044-45 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 20 लाख कोटी डॉलरची होईल तर 2047-48 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 26 लाख कोटी डॉलरची होईल असे या संस्थेला वाटते.
दरम्यानच्या काळात भारताच्या नागरिकांचे दरडोई उत्पन्न 15 हजार डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था 3 लाख कोटी डॉलरची आहे. प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे भारताचे दरडोई उत्पन्न कमी आहे.