मुंबई – अनेक दशकांपासून सुरू असलेला इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष संपवण्यासाठी भारत दोन देशांच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावर आधारीत तोडग्याला अनुकूल आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले. हमासने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या हल्ल्यानंतर गाझामध्ये सुरू झालेले युद्ध थांबण्याची अद्यापही कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. याबाबत ते बोलत होते.
इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या कार्यक्रमादरमायान आयोजित वार्तालापात ते बोलत होते. ही भारताची भूमिका आहे. तसेच हा दीर्घकाळ सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी अनेक देशांचीही हीच भूमिका आहे, असेही जयशंकर म्हणाले.
पॅलेस्टाईननेही इस्रायलचे अस्तित्व मान्य करायला पाहिजे. तसेच इस्रायलनेही पॅलेस्टाईनचे अस्तित्व स्वीकारायला हवे. कारण यापैकी कोणताही एक प्रयाय स्वीकारला तर दुसरा पर्याय नाकारल्यासारखे होईल. सध्या हेच केले जाते आहे. त्यामुळेच हा संघर्ष सुटण्याची कोणतीही चिन्हेदिसत नाहीत, असेही जयशंकर म्हणाले.
७ ऑक्टोबरचा हल्ला दहशतवाद्यांचाच…
इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबरला झालेला हमासचा हल्ला हा दहशतवादी हल्लाच होता, हे स्पष्ट आहे. याबाबत मनामध्ये कोणताही गैरसमज असता कामा नये. विशेषतः दहशतवाद अनुभवलेल्या भारताच्या मनामध्ये तरी याबाबत कोणताही संदेह नाही, हे निश्चित आहे. मात्र जेंव्हा या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाते, तेंव्हा आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केले गेले पाहिजे हे देखील तितकेच महत्वाचे आहे, असेही जयशंकर यांनी सांगितले.