नवे लष्करप्रमूख जनरल नरवणे यांचा पाकिस्तानला इशारा
नवी दिल्ली : शेजारील राष्ट्रांनी सरकार पुरस्कृत दहशतवाद थांबवला नाही तर दहशतीच्या मुळावर हल्ला करण्याचा आमचा अधिकार अबाधित आहे, अशा शब्दात भारताचे नवनियुक्त लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पकिस्तानला इशारा दिला.
सुमारे 13 लाख कर्मचारी असणाऱ्या लष्कराच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नरवणे पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हिंसाचाराला सडेतोड आणि जरब बसेल असे उत्तर देऊ, असे ते म्हणाले.
पाकिस्तानी लष्कराने सरकार पुरस्कृत दहशतवादावरून लक्ष विचलीत करण्याचे केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. काश्मिरातून 370 कलम उठवल्यानंतर तेथील परिस्थिती वेगाने सुधारत आहे. दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याने पाकिस्तानी लष्कराच्या छुप्या युध्दाला खीळ बसली आहे. भारतातील त्यांचे दहशतवाद्यांचे जाळेही उद्ध्वस्त झाले आहे, असेही नरवणे यांनी सांगितले.
कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी लष्कर सदैव सज्ज ठेवणे हाच माझा प्राधान्याचा विषय असेल, क्षमतांमध्ये वाढ आणि कारवाईत्मक तत्परता हा लष्कराच्या विकासाचा गाभा आहे, असे मत जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी व्यक्त केले.
पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना तुम्ही कसे उत्तर देणार या प्रश्नाला ते म्हणाले, पाकिस्तानने पुरस्कृत केलेला किंवा घडवलेल्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला उत्तर देण्याचे अनेक पर्याय आम्ही ठरवून ठेवले आहेत. त्यांचा वापर आम्ही निश्चित करू, असे त्यांनी सांगितले.
चीन बरोबर असणाऱ्या साडेतीन हजार किमी लांबीच्या सीमेच्या रक्षणाबाबत जनरल नरवणे म्हणाले, आम्ही परिस्थितीनुरूप पश्चिम सीमेकडून उत्तर सीमेकडे आमचे लक्ष वळवत असतो. उत्तर सीमेवर आम्ही हव्या त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आम्ही क्षमतांचा विकास करत आहोत.
संरक्षण दल प्रमुख पदाच्या निर्मितीबाबत ते म्हणाले, या पदामुळे संरक्षण दलातील कार्यपध्दतीत मोठी सुधारणा होणारआहे. त्यामूळे संपूर्ण लष्करी यंत्रणेचा महत्वाचे फेरबदल होणार आहेत.