नवी दिल्ली – जागतिक पातळीवरील नावीन्य निर्देशांकात भारत सध्या 57 क्रमांकावर आहे. नवा अहवाल बुधवारी जाहीर होणार आहे. त्यात भारताची परिस्थिती सुधारलेली असेल, असे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांनी सांगितले.
ते म्हणाले की, 2016 मध्ये भारत 66 व्या, 2017 मध्ये 60व्या, तर 2018 मध्ये 57 व्या क्रमांकावर होता. दरम्यानच्या काळात भारताने उद्योग-व्यवसाय करणे सुलभ व्हावे म्हणून बरेच प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर स्टार्टअपसारख्या नवीन उपक्रमांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या निर्देशांकात भारत लवकरच पहिल्या पंचवीस देशांच्या यादीत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारने बरेच गुंतागुंतीचे कायदे रद्द केले आहेत. त्याचबरोबर जीएसटीमुळेही उद्योग करणे बरेच सोपे झाले आहे.