विशाखापट्टणम: कर्णधार विराट कोहलीच्या भारतीय संघाला आज येथे होत असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांत आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक बनला आहे. चेन्नईतील पहिला सामना गमावल्याने हा सामना भारतीय संघासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. भारताने चेन्नईतील सामन्यात 287 धावा उभारुनही वेस्ट इंडिजच्या शेमरन हेटमायर व शाय होप यांनी शतके फटकावत एक सोपा विजय मिळविला होता.
या सामन्यात भारतीय संघाचे गोलंदाज तसेच क्षेत्ररक्षक यांची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती. आगामी काळातील महत्वाच्या मालिका समोर ठेवत भारताने संघात नवोदीत खेळाडूंना संधी दिली होती, मात्र त्यांच्या कामगिरीत देखील सातत्याचा अभावच दिसुन येत आहे. यष्टीरक्षक ऋषभ पंतला सुर गवसला असला तरी तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरुन पंत खरेच संघासाठी लाभदायक ठरेल का याची शंका व्यक्त केली जात आहे.
पहिल्या सामन्यात सलामीवीर लोकेश राहुल, रोहित शर्मा तसेच कर्णधार कोहली यांना अपयश आल्याने श्रेयस अय्यर व पंत यांच्यावर संघाची मदार होती. त्यांनीही जबाबदारीने खेळ केला मात्र वेस्ट इंडिजच्या फलंदाजांसमोर 287 ही धावसंख्या विजय मिळविण्यासाठी पुरेशी नव्हती हेच सिद्ध झाले. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 0-1 असा पिछाडीवर आहे. आजच्या सामन्यातील विजयासह मालिकेत बरोबरी करुन कटक येथे 22 डिसेंबरला होणारी निर्णायक लढत खेळण्यासाठी कोहली आणि कंपनी उत्सुक आहे. मात्र त्यासाठी आजच्या सामन्यात त्यांना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना रोखण्यासाठी आराखडा तयार करावा लागणार असून त्यानुसारच खेळ करावा लागणार आहे.
बुमराहचा कसून सराव भारतीय गोलंदाजीचा कणा असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघाच्या सराव सत्रात उपस्थित राहुन खेळाडूंबरोबर कसून सराव केला. त्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री तसेच सहाय्यक प्रशिक्षक भारत अरुण यांच्याशी चर्चा करुन सराव सत्रात गोलंदाजीचा सराव केला. त्यातूनच त्याने आपण लवकरच संघात पुनरागमन करणार असल्याचे संकेत दिले. आजच्या सामन्यात कदाचीत केदार जाधवच्या जागी मयांक अग्रवालला संधी देत फलंदाजी मजबूत करण्यात येऊ शकते.
तसेच कुलदीप यादवच्या जागी यजुर्वेंद्र चहलला स्थान देण्याचीही शक्यता आहे. रवींद्र जडेजासह सर्व प्रमुख गोलंदाजांना अचूक गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अंकूश ठेवावा लागणार आहे. मोठी धावसंख्या चेन्नईत सहज पार केल्याने वेस्ट इंडिजसमोर नेमकी कीती धावसंख्या ठेवावी याबाबतही कोहली संभ्रमात राहील. वेगवान गोलंदाजांचा समर्थपणे सामना करण्यात त्यांना यश आलेले पाहता फिरकीच्याच चक्रव्युहात त्यांना बांधून ठेवावे लागेल. त्याचबरोबर सलामीला राहुलच्या जागी अग्रवालला स्थान देण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.