नवी दिल्ली : आमच्याकडे पर्यायी व्यवस्था उपलब्ध असल्यास जर परिस्थिती उद्भवली तर कोरोना विषाणू ग्रस्त हुबेई प्रांतातून पाकिस्तानी विद्यार्थ्यांना सोडवून आणण्याचा भारत विचार करेल. मात्र पाकिस्तानने तशी विनंती अद्याप केली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरूवारी स्पष्ट केले.
भारताकडून धडा शिकत आम्हाला येथून हलवा, अशी मागणी हुबेई प्रांतात अडकलेल्या शेकडो पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान इम्रानखान यांच्याकडे केली आहे. भारताने आम्हाला सोडवावे, अशी विनंतीही काही विद्यार्थ्यांनी केली आहे.
पाकिस्तानी विद्यार्थ्यांना हलवण्यासाठी भारत काही मदत करेल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्ते रविशकुमार म्हणाले, पाकिस्तान सरकारकडून आम्हाला अशी कोणतीही विनंती करण्यात आली नाही. पण अशी परिस्थिती उद्भवली तर उपलब्ध साधन सामुग्रीचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ. मात्र, त्यांनी यासाठी कोणत्या अटी असतील याबाबत भाष्य केले नाही.