इम्रान खान यांचा थयथयाट
इस्लामाबाद -जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्रदान करणारे 370 वे कलम भारताने रद्द केल्याने पाकिस्तानचा मोठाच जळफळाट झाला आहे. त्यातून दोन्ही शेजारी देशांचे संबंध आणखीच बिघडतील, असा थयथयाट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.
भारताच्या धडक पाऊलामुळे जम्मू-काश्मीरवर वाकडी नजर ठेऊन असणाऱ्या पाकिस्तानला जोर का झटका बसला आहे. त्याचेच प्रतिबिंब इम्रान यांच्या प्रतिक्रियेतून उमटले. काश्मीरचा दर्जा बदलण्याची कृती अवैध आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचा भंग करणारी असल्याची दर्पोक्ती इम्रान यांनी केली.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडतील, असे म्हणताना त्यांनी दोन्ही देशांचा उल्लेख अण्वस्त्रधारी म्हणून केला. त्यातून त्यांनी भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी इम्रान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.
त्या भेटीवेळी ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यामुळे पाकिस्तानला आनंदाचे भरते आले होते. मात्र, नंतर दोन्ही देशांची तयारी असेल तरच मध्यस्थी करू, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केल्याने पाकिस्तानचा हिरमोड झाला. आता भारताने उचललेल्या पाऊलामुळे पाकिस्तानची अवस्था केविलवाणी झाली आहे.