इस्लामाबाद: शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीवेळी भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये संवाद घडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दोन्ही देशांमध्ये सध्या असलेल्या तणावाची कोंडी फुटण्यास हातभार लागण्याची शक्यता आहे.
एससीओची मंत्रिस्तरीय बैठक किरगिझस्तानमध्ये 21 आणि 22 मे यादिवशी होणार आहे. त्या बैठकीला भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीदरम्यान दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची इतर देशांच्या मंत्र्यांशी चर्चा होईल. त्यावेळी स्वराज आणि कुरेशी यांच्यात संवाद घडू शकतो, असे पाकिस्तानी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसल गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
अर्थात, स्वराज आणि कुरेशी यांच्यात औपचारिक बैठक निश्चित करण्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तानमधील चर्चाप्रक्रिया बराच काळापासून ठप्प आहे. अशात पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने फेब्रुवारीत जम्मू-काश्मीरच्या पुलवामात भयंकर आत्मघाती हल्ला घडवला. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहचला. त्यातून दोन्ही देशांत काही काळ संघर्षाची स्थितीही निर्माण झाली होती.