नवी दिल्ली – तीन राज्यांतील भाजपच्या (Bjp) विजयानंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला (Farukh Abdulla) यांनीही याबाबत भाष्य करताना आघाडीला अधिक परिश्रम घ्यावे लागतील असे म्हटले आहे. (India Aghadi)
फारूख अब्दुल्ला म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा इंडिया आघाडीवर फारसा परिणाम होणार नाही. मात्र आम्हाला अधिक कष्ट घ्यावे लागतील कारण सगळ्यांच्या हितासाठी आम्हाला भारत एकसंध ठेवायचा आहे. त्यामुळे अधिक ताकदीने आम्हाला सगळ्यांना यापुढे काम करावे लागेल. विजय आणि पराभव या दोन्हीतून बोध घेण्याची गरज आहे. (Bjp vs Congress)
इंडिया आघाडीचीही सगळ्यांना काळजी घ्यावी लागेल. मध्य प्रदेशात जागावाटपावरून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि कॉंग्रेस यांचे बिनसले. त्याबाबत बोलताना फारूख अब्दुल्ला म्हणाले की सगळ्यांना सामावून घ्यावे लागेल आणि मैदान अजून बरेच पुढे आहे.
दरम्यान, फारूख अब्दुल्ला यांचे पुत्र आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही यावर भाष्य केले. ते म्हणाले की समाजवादी पक्षाला कॉंग्रेसने पाच- दहा जागा सोडल्या असत्या तर असा काय फरक पडला असता? असेही त्यांना तेथे विजय मिळाला नाही. काही जागा त्यांनी सोडल्या असत्या तर कदाचित तेथे चांगली स्थिती आज असती.