मुंबई – राज्यसभा निवडणुकीआधी भाजपकडून अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांवर दबाव टाकला जातोयं, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी केला. राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी समर्थ आहे. फक्त आमच्या हातात ईडी नाही, असा तिरकस टोमणाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीने 4 आणि भाजपने 3 उमेदवार दिल्याने ती निवडणूक रंगतदार बनली आहे. निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही बाजूंकडून आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर, राऊत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना भाजपवरील आरोप आणि टीकेचे सत्र सुरूच ठेवले.
भाजपने तिसरा उमेदवार देऊन निवडणूक अटळ बनवली. तो पक्ष अपक्ष आणि लहान पक्षांवर अवलंबून आहे. त्यातून अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांवर कशाप्रकारे दबाव आणला जातोय त्याची माहिती दररोज आमच्याकडे येतेयं. ज्यांच्यावर दबाव आणला जातोय; ते आमचेही मित्र आहेत.
निवडणुका लढवण्याचा आम्हालाही चांगला अनुभव आहे. महाविकास आघाडी राज्यसभेच्या 4 जागा जिंकणारचं. त्यामुळे भाजपने उगाच पैसे वाया घालवू नयेत. एखाद्या सामाजिक कार्यासाठी ते वापरावेत, असा शाब्दिक टोला राऊत यांनी लगावला.