ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांची समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर बिनविरोध निवड… कॉंग्रेसने प्रदेश कार्याध्यक्ष पदासारखी मोठी जबाबदारी दिलेले तरूण नेते हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश… माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीविषयी उघड नाराजी… पंजाबमधील चार माजी मंत्री एकाच दिवशी भाजपमध्ये डेरेदाखल…अलिकडच्या काळात घडलेल्या या घडामोडींमधून कॉंग्रेसमधील अस्वस्थता, असंतोष, धुसफूस या बाबी पुन्हा अधोरेखित झाल्या. ती स्थिती कायम राहिल्यास कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाचे ऋण नेमके फेडणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्रातील सत्तेवरून 2014 मध्ये पायउतार व्हावे लागल्यापासून कॉंग्रेसची राजकीय घसरण सुरू आहे. एकापाठोपाठ होणाऱ्या निवडणुकांत पक्षाची पीछेहाट होत आहे. त्यामुळे राजकीय भवितव्य धोक्यात येण्याच्या धास्तीतून अनेक नेते पक्षाचा हात सोडत आहेत. ती गळती रोखण्यासाठी आणि पक्ष संघटनेचे पुनरूज्जीवन करण्यासाठी कॉंग्रेसने हालचाली सुरू केल्या.
पुढील दिशा ठरवण्यासाठी पक्षाने नुकतेच नवसंकल्प चिंतन शिबिर घेतले. त्या शिबिरात आणि त्याआधी झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत सोनियांनी महत्वाची भूमिका मांडली. पक्षाने आजवर आपल्याला खूप काही दिले आहे. आता पक्षाचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे. पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी कुठली जादुची कांडी उपलब्ध नाही. त्यासाठी सर्वांनाच नि:स्वार्थपणे आणि निष्ठेने कार्य करावे लागेल, असे आवाहन त्यांनी कॉंग्रेसजनांना केले.
मात्र, कॉंग्रेसने बरेच काही दिलेल्या नेत्यांना निष्ठेपेक्षाही राजकीय स्वार्थ महत्वाचा वाटत असल्याचे अलिकडच्या घडामोडींमधून सूचित होते. सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी कॉंग्रेसचा हात सोडला. हार्दिक यांच्यासारख्या तरूण नेत्याला बडे पद देऊनही त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. पंजाबमध्ये सत्ताबदल होताच काही माजी मंत्र्यांनीही पक्ष बदलला. त्यातून ते पक्षाचे ऋण मानत नसल्याचेच स्पष्ट होते.
भाजपने घेतलेल्या निर्णयांविरोधात त्या पक्षातील नेते उघडपणे आक्षेप घेतानाचे उदाहरण सहजासहजी आढळत नाही. पण, कॉंग्रेसमध्ये नेमके उलट चित्र दिसते. कॉंग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी या उत्तरप्रदेशातील नेत्याची उमेदवारी जाहीर केली. त्यावरून महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य पाहावयास मिळाले. पक्षांतर्गत लोकशाही या गोंडस नावाखाली कॉंग्रेस तशी नाराजी खपवूनही घेताना दिसतो. पण, तशाप्रकारच्या उघड नाराजीने पक्षाविषयीच सर्वत्र चुकीचा संदेश जातो.
अलिकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांकडून जाहीरपणे व्यक्त केली जाणारी नाराजी आणि पक्षबदलूंबाबत बरीच कठोर भूमिका घेतल्याचे दिसते. भाजपविरोधात राजकीय लढा देण्याचे धैर्य नसणाऱ्यांनी खुशाल कॉंग्रेसमधून बाहेर पडावे. कुठली नाराजी असेल तर ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडावी, अशी परखड भूमिका ते वारंवार मांडताना दिसतात. अर्थात, कॉंग्रेस नेतृत्वानेही पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
असंतुष्टांची गाऱ्हाणीही ऐकायला हवीत. अन्यथा, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या शांत, संयमी नेत्यावरही नाराजी उघड करण्याची वेळ येते. कॉंग्रेसच्या शिबिरात चिंतन झालेच नाही, अशी टिप्पणी त्यांनी नुकतीच केली. एवढेच नव्हे तर, राहुल यांच्याशी चार वर्षांपासून भेट होऊ शकलेली नसल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. त्यातून कॉंग्रेस नेतृत्वाची भेट सहजासहजी होत नसल्याची भावना पक्षात असल्याचे चित्र समोर येते. तेही कॉंग्रेससाठी चांगले लक्षण नव्हे!