मुंबई – छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपला रामराम करत स्वत:ची संघटना स्थापन करून अपक्ष म्हणून राज्यसभा खासदारकीची निवडणूक लढवणार अशी घोषणा केली. यानंतर छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारी अर्जावर रायगड जिल्ह्यातील उरण मतदारसंघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी पहिली सही केली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी आमदार महेश बालदी यांच्या उरण येथील निवासस्थानी आज भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी आमदार बालदी यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून पहिली स्वाक्षरी केली.
दरम्यान, दरम्यान, संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याप्रसंगी राज्य समन्वयक अंकुश कदम व धनंजय जाधव यांनी महाराष्ट्रातील सर्व अपक्ष आमदारांना छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
शरद पवारांचाही पाठिंबा?
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, प्रत्येक पक्षाचे संख्याबळ किती आहे, यावर सर्व अवलंबून असते. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतो. आमच्याकडे 10 किंवा 12 मत शिल्लक आहे. त्यांच्यानंतर शिवसेनेकडे सुद्धा चार पाच मत आहे, त्यांचीही काही अडचण राहणार नाही. राहिला प्रश्न कॉंग्रेसचा तर ते सुद्धा मदत करतील, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.