पुणे – आपण मशिन नसून मिशन आहोत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेहमीच सांगतात. एक एक वीट रचून त्यांनी संघटनेचा किल्ला बनवला आणि मजबूत केला आहे. त्यांचे हे कौशल्य शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी केले.
“अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन इराणी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, प्रदेश संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, श्वेता महाले, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, माजी खासदार प्रदीप रावत, मूळ हिंदी पुस्तकाचे लेखक शिवानंद द्विवेदी, अनुवादक ज्योत्स्ना कोल्हटकर आणि प्राची जांभेकर आदी उपस्थित होते.
हे पुस्तक एका व्यक्तीची जीवनगाथा आहे, ज्याला कोणीच पूर्ण ओळखत नाहीत. शहा यांनी संपूर्ण राष्ट्राचा 60 वेळा प्रवास केला आहे. अगदी गल्लीबोळातून त्यांनी हा प्रवास केला आहे. त्यांचे पहिले घर म्हणजे रेल्वे, दुसरे संघशिबिर आणि तिसरे घर संघ कार्यकर्त्याचे घर असे ते सांगतात. चौथे घर कोणते ते जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचा.
शहा यांच्यामागे एक कठोर व्यक्तीमत्त्व दिसते. त्यांच्या घरी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि चाणक्य यांच्या प्रतिमा लावलेल्या दिसतात. लोकतांत्रिक परंपरा कशी निर्माण करायची हे चाणक्यांचे वैशिष्ट्य होते, हे शहा यांनी अंगीकारण्याचा प्रयत्न केला आहे, असे इराणी यांनी नमूद केले.
भाजपचा विस्तार मोदी-शहा यांनी केला. आपल्याला जे करायचे आहे ते, झोपेतही शहा विसरत नाहीत; असे सांगून 370 कलम रद्द कसे केले, याचा प्रवास आपल्याला शहा यांनी सांगितल्याचे पाटील म्हणाले. अनुवादक कोल्हटकर यांनी पुस्तकाच्या निर्मितीविषयी माहिती दिली.
पक्ष सांगेल तेथे लढण्याची तयारी हवी : खासदार बापट
या कार्यक्रमातही खासदार गिरीश बापट यांनी शब्दांचे षटकार मारले. पक्ष सांगेल तेथे लढण्याची कार्यकर्त्याची तयारी हवी. पक्षाने इराणींना अमेठीतून लढण्यास सांगितले त्या तेथून लढल्या, असे सांगताना प्रदेशाध्यक्ष चंद्द्रकांत पाटील यांनाही पक्षाने पुण्यातून लढण्याचे आदेश दिले आणि ते यशस्वी झाले, असा टोमणा मारला. 20-25 जागा जास्त जिंकायच्या असतील तर पक्ष सांगेल तेथे लढण्याची तयारी दर्शवली पाहिजे. येथे आपले कार्यक्षेत्र नाही मग कशाला निवडणूक लढायची असा विचार करू नये, असा सल्लाही बापट यांनी दिला.