नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 ऑगस्ट 2021 ( रविवारी) रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावतील तेव्हा सलग आठव्यांदा तो मान मिळविणारे ते पहिले बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान ठरतील. यापूर्वी हा विक्रम अटलबिहारी वाजपेयी (6 वर्षे) यांच्या नावे होता. मागील वर्षी मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम मागे टाकला होता.
नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या नतृत्वाखालील भाजपने 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा कॉंग्रेस आघाडीला पराभूत करत लोकसभेत घवघवीत बहुमत मिळविले . त्यानंतर तिसऱ्या वर्षी मोदी यंदा लाल किल्ल्यावरून ( Red Fort ) तिरंगा फडकावतील. पंतप्रधान मोदी यंदा सलग आठव्यांदा तिरंगा फडकावतील आणि यासह हा बहुमान मिळवणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर पोहोचतील.
यापूर्वी स्वातंत्र्यदिन ( Indian Independence Day ) साजरा करताना दिल्लीतील लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा आणि देशाला संबोधित करण्याचा बहुमान (विक्रम) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. त्यांनी तब्बल 17 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. तर इंदिरा गांधी (16 वर्षे) या दुसर्या क्रमांकावर आणि मनमोहन सिंग (Manmohan Singh) (सलग 10 वर्षे) तिसर्या क्रमांकावर आहेत.
पंडित जवाहरलाल नेहरू ( Pandit Jawaharlal Nehru ) यांनी देश स्वतंत्र झाल्यावर पहिल्यांदा 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. 27 मे 1964 पर्यंत ते पंतप्रधान होते. या कालावधीत त्यांनी 17 स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण केले.
नेहरूंच्या पाठोपाठ 16 वेळा इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला आहे. इंदिरा गांधी (Indira Gandhi ) 1966 ते 24 मार्च 1977 पर्यंत आणि 14 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 1984 पर्यंत भारताच्या पंतप्रधान होत्या. पहिल्या कार्यकाळात त्यांनी 11 वेळा तर दुसर्या कार्यकाळात 5 वेळा ध्वजारोहण केले.
लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवणारे आणि देशाला संबोधित करणारे बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान खालीलप्रमाणे :
(1)मोरारजी देसाई
(2)चौधरी चरणसिंग
(3)विश्वनाथ प्रताप सिंह
(4)एच डी. देवेगौडा
(5)इंद्रकुमार गुजराल
(6) अटलबिहारी वाजपेयी
(7) नरेंद्र मोदी (2014 पासून आजपर्यंत)
दरम्यान, लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावणारे पहिले बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान सत्तेवर येण्यास देशात 1977 साल उजाडले. इंदिरा गांधीचा पराभव करून सत्तेवर आलेल्या जनता सरकारचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी तो 1977-78 या वर्षी मान मिळविला होता.