शिवसेनेचे हवेली तालुकाध्यक्ष प्रशांत काळभोर यांची मागणी
लोणी काळभोर- हवेली तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने शेती उद्ध्वस्त झाली आहे. भाजीपाल्याच्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कुठलेही नियम व अटी न लावता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे हवेली तालुकाध्यक्ष प्रशांत काळभोर यांनी केली आहे.
काळभोर म्हणाले की, हवेली तालुक्याच्या पूर्व भागात काही दिवस सतत पाऊस पडत आहे. भाजीपाल्याच्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मका, कडवळ आदी चारा पिकांसह गुलाब, गुलछडीसारखी फूले कांदा, बाजरी, कोबी, फ्लॉवर, पेरू, वांगी, गवार, भेंडी, काकडी, कारली, दोडका, भोपळा, टॉमेटो कांदा पात यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. बाजरीही धोक्यात आली आहे. सततच्या पावसामुळे वाफश्याअभावी मेहनत न करता आल्याने तण माजले आहे.
पाऊस थांबल्यावर पुढील पिकांसाठी जमीन तयार करण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज भासणार आहे. सातबाऱ्यावर पहिल्याच कर्जाचा बोजा असल्याने त्याला नवीन कर्ज मिळणार नाही. नवीन पीक करण्यासाठी ट्रॅक्टर, बी, औषधे, खते याबरोबरच घरखर्च चालवण्यासाठी त्याला पैशांची गरज लागणार आहे. त्यामुळेच पंचनामे, अर्ज, फोटो असे कागदी घोडे न नाचवता व जाचक नियम, अटी, निकष न लावता शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची गरज आहे. म्हणून राज्य सरकारने तातडीने हालचाली करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी आग्रही मागणी प्रशांत काळभोर यांनी केली आहे.
- शेतकरी उपाशी, ग्राहक भरडले
सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत आहे. कमी दर्जाचा भाजीपाला खावा लागत आहे. मात्र, याचे भाव मात्र अक्षरशः गगनाला भिडले आहेत. शनिवारी आठवडे बाजारात कोथींबीरीची गड्डी 70 रुपयांना तर मेथीची गड्डी 40 ते 50 रुपयांना विकली गेली. भाववाढीमुळे सर्वसामान्य गृहिणींचे आठवडा बाजाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.