नगर – लॉकडाऊन पाचचा टप्पा सुरु झाल्यानंतरही नाभिक समाजाच्या अडचणी अद्याप दूर झालेल्या नाहीत. त्यामुळे नाभिक समाजाच्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून (ता. 8) राज्यव्यापी बेमुदच उपोषण सुरु करण्याचा ठराव करण्यात आला. सोमवारी सकाळी दहा वाजता नगरमधील श्री संत सेना भवन येथून आंदोलनास प्रारंभ होईल, अशी माहिती महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊन यांनी दिली.
महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचे मोजके पदाधिकारी व सदस्यांची काल नगरमधील श्री संत सेना भवनात बैठक झाली. त्याच आमरण उपोषण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील वाघमारे, सरचिटणीस विकास मदने, अनिल निकम, नवनाथ राऊत, संतोष तापकीरे, युवराज राऊत, भाऊसाहेब काळे, अशोक खामकर, मनोज शिंदे, सचिन शिंदे, नितीन शिंदे, प्रमोद शेजुळ, सुरेश राऊत, चंदू बिडवे, जनार्धन वाघ, शहाजी कदम, आबा सैंदाणे, आजिनाथ रावतळे, सुनील खंडागळे यांच्यासह अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने शासनाकडे वेळोवेळी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. मात्र, त्याकडे सातत्याने दूर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सलून व्यावसायिकांनी सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन केले. नियमांत बसत नसल्याने आपले व्यवसाय पूर्णत: बंद ठेवले.
उद्भवलेल्या या परिस्थितीने आता सलून व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे असतानाही सरकार समाजासाठी कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नाही किंवा कोणतेही आर्थिक पॅकेज देण्यास संदर्भात चर्चा करताना दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण समाजाला आता सरकारच्या विरोधात आमरण उपोषण करण्याशिवाय कोणताच पर्याय दिसत नसल्याची भूमिका यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडली.