गुवाहाटी – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी-२० सामना आज गुवाहाटी येथे खेळला गेला. या मोठ्या सामन्यात भारतीय संघाने निसटता विजय मिळवला. भारताने आफ्रिकेला सामन्यात १६ धावांनी पराभूत केले. यासह भारताने मायदेशात मालिका विजयाचा इतिहास बदलला. भारताने पहिल्यांदा मायदेशात आफ्रिकेविरुध्द्व टी-२० मालिका जिंकली आहे. भारताने या ३ सामन्याच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार टेम्बा बवूमा याला भोपळाही फोडता आला नाही. तो अर्शदीप सिंगच्या धारदार गोलंदाजीचा शिकार ठरला. यानंतर खेळपट्टीवर आलेल्या रिले रुसोही दोन चेंडू खेळून अर्शदीपचा शिकार ठरला. आफ्रिकेचे दोन फलंदाज एकाच षटकात बाद झाल्याने संघावर दडपण आले. यानंतर एडन मार्कराम आणि क्विंटन डिकॉक यांनी आफ्रिकेच्या डावाला सावरले. मार्कराम १९ चेंडूत ३३ धावा करून अक्षर पटेलच्या गोलंदाजीचा बळी ठरला. यानंतर खेळपट्टीवर आलेल्या डेव्हिड मिलरने डिकॉक साथीने संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. मिलरने १०६ धावांची शतकीय पारी खेळली.
तत्पूर्वी, सलामीवीर लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव व दीनेश कार्तिक या पाचही प्रमुख फलंदाजांनी केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने तिन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावांचा डोंगर उभारला.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकत टीम इंडियाला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय फलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवत वादळी फलंदाजी केली. कर्णधार रोहितच्या साथीत राहुलने संघाला 10 व्या षटकांत 96 धावांची सलामी दिली. रोहित चांगला खेळत असताना 43 धावांवर बाद झाला. त्याने 37 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. 57 धावांच्या या खेळीत त्याने 28 चेंडूत 5 चौकार व 4 षटकार फटकावले.
धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्यावेळी कोहलीला साथ देण्यासाठी प्रचंड भरात असलेला सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर आला व त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. त्याने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली.
सूर्यकुमार 61 धावांवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्याने या खेळीत अवघ्या 22 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली. तो बाद झाल्यावर दीनेश कार्तिकने कोहलीला साथ दिली. अखेरच्या दोन षटकांत कोहलीने आक्रमक खेळी केली. मात्र, वीसाव्या षटकांत त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही व त्याचे अर्धशतक पूर्ण होऊ शकले नाही. तो 28 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह 49 धावांवर नाबाद राहिला. तर या षटकात अफलातून फटकेबाजी करणारा दीनेश कार्तिक 7 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 17 धावांवर नाबाद राहिला.