भारत आणि श्रीलंका यांच्यात (आज) गुरुवारी पुण्यात दुसरा टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नेणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सामान्यांच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजी कामगिरी अत्यंत सुमार अशीच राहिली. त्यामुळे श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले.
सुरुवातीला फलंदाजी करताना ६ गडी गमावून २०६ धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे भारताला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार होती. मात्र, भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली आणि संघाला १६ धावांनी पराभव पत्करावा लागला.
यादरम्यान, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंगने निराशाजनक विक्रमाची नोंद केली आहे. त्याने या सामन्यात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने एकाच सामन्यात सर्वाधिक नो-बॉल टाकण्याचा नकोस असा विक्रम नावावर केला. डावाच्या दुसऱ्यात षटकात त्याने पहिले पाच चेंडू योग्य फेकले. या पाच चेंडूत त्याने फक्त पाच धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सहाव्या चेंडूसाठी त्याने तीन नो-बॉल फेकले. तसेच त्याने संपूर्ण डावात ५ नो-बॉल फेकले. त्याच्या या खराब कामगिरीचा भारतीय संघाला मोठा फटका बसला.
अर्शदिप सिंगने या डावात ४ षटकांत ३७ धावा खर्च केल्या आणि त्याला एकही गडी बाद करता आला नाही. टी-२० विश्वचषकात भारतासाठी दमदार गोलंदाजी करणाऱ्या अर्शदिपने या सामन्यात मात्र पूर्णपणे निराशा केली. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी या सामन्यात ७ नो-बॉल टाकल्याने भारताला याचा मोठा फटका बसला आणि परिणामी संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.