IND vs SA 2nd Test: आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे, सामन्यापूर्वीच भारतीय कर्णधार रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज डीन एल्गरबाबत मोठे वक्तव्य केले आहे, ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
डीन एल्गरचा हा शेवटचा सामना असल्याने टीम इंडियाच्या कर्णधाराने त्याचे खूप कौतुक केले आहे तसेच या सामन्यात एल्गरला लवकरात लवकर बाद करायला आवडेल असे देखील म्हटले आहे. रोहित शर्माच्या मते, डीन एल्गरची विकेट खूप महत्वाची आहे कारण तो सहजासहजी बाद होत नाही.
सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात डीन एल्गरने जबरदस्त शतक झळकावले. एल्गरने 287 बॉलमध्ये 28 चौकार मारत 185 धावांची खेळी केली. अशास्थितीत कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यातही त्याला अशीच खेळी खेळायला आवडेल. या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेतरोहित शर्माने डीन एल्गरबद्दल प्रतिक्रिया दिली.
यावेळी शर्मा म्हणाला, “डीन एल्गर गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख खेळाडू आहे. तो आमच्याविरुद्ध खूप धावा करतो, तो जबरदस्त खेळाडू आहे. त्याला त्याच्या विकेटचे महत्त्व कळते आणि तो सहजासहजी आऊट होत नाही. जर आम्ही त्याला लवकर बाहेर काढले तर आमच्यासाठी खूप चांगले होईल. एल्गरची विकेट किती महत्त्वाची असेल. आम्ही एक योजना तयार केली आहे आणि आशा आहे की ती कार्य करेल.”
भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. मात्र, आता दुसरी कसोटी जिंकून रोहित शर्मा आणि टीमला मालिका 1-1 अशी बरोबरीत करायची आहे.