India vs England 1st Test : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंड संघाने 28 धावांनी सामना जिंकला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 246 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 436 धावा केल्या आणि 190 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडने 420 धावा केल्या आणि भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडिया 202 धावांवर गडगडली आणि सामना गमावला.
भारताने इंग्लडंविरूध्दच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 100 धावांची आघाडी घेतली होती, मात्र त्यांना सामना जिंकता आला नाही. कसोटी इतिहासात टीम इंडियाने घरच्या मैदानावर 100 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे, पण सामना जिंकण्यात अपयश आले. याआधी टीम इंडियाने 1965 मध्ये चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 65 धावांची आघाडी मिळवली होती आणि त्यानंतर पराभव पत्करावा लागला होता.
WTC Points Table : इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचे झालं मोठं नुकसान….
भारतामध्ये सर्वाधिक आघाडी घेतल्यानंतर पराभवाच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल आहे. 2001 मध्ये कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 274 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर टीम इंडियाने आश्चर्यकारक कामगिरी करत 171 धावांनी सामना जिंकला होता. आता 190 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताचा इंग्लंडविरुद्ध पराभव झाला. 2005 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारतावर 99 धावांची आघाडी मिळवली होती. यानंतर टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत 13 धावांनी सामना जिंकला होता.
आघाडी घेतल्यानंतरही भारताचा पराभव…
साल 2015 Vs श्रीलंका (गाॅल कसोटी), 192 धावांची आघाडी
साल 2024 Vs इंग्लंड (हैदराबाद कसोटी), 190 धावांची आघाडी
साल 2022 Vs इंग्लंड (बर्मिंगहॅम कसोटी), 32 धावांची आघाडी
साल 1992 Vs ऑस्ट्रेलिया (ॲडलेड कसोटी), 80 धावांची आघाडी
साल 2008 Vs ऑस्ट्रेलिया (सिडनी कसोटी), 69 धावांची आघाडी
भारताचा सर्वात लहान चौथा पराभव…
कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत हा चौथा सर्वात लहान पराभव झाला आहे. याआधी भारताला 1999 मध्ये चेन्नई येथे पाकिस्तानविरुद्ध 12 धावांनी, 1977 मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 धावांनी आणि बंगळुरूमध्ये 1987 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 16 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता हैदराबादमध्ये इंग्लंडविरुद्ध 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 2018 मध्येही बर्मिंगहॅममध्ये इंग्लिश संघाकडून 31 धावांनी पराभव झाला होता.
महायुद्धानंतर हे चौथ्यांदा घडले…
भारताविरूध्दच्या या सामन्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी एकही विकेट घेतली नाही. दोन्ही डावांसह इंग्लडंच्या फिरकीपटूंनीच भारताचे एकूण 20 बळी घेतले. महायुद्धानंतर (1945) ही चौथी वेळ आहे की इंग्लिश संघाने विरोधी संघाला दोन्ही डावात बाद केले, परंतु त्यांच्या वेगवान गोलंदाजांना एकही यश मिळाले नाही. 1952 मध्ये भारत विरुद्ध कानपूर कसोटीत, 1956 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मँचेस्टर कसोटी आणि 2018 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पल्लेकेले कसोटीत असं घडले आहे.
हार्टलीने केली विशेष कामगिरी….
टॉम हार्टलीने दुसऱ्या डावात 62 धावांत सात बळी घेतले. 1950 नंतर इंग्लंडकडून कसोटी पदार्पणात फिरकी गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या सामन्यात त्याने एकूण नऊ विकेट घेतल्या. 1950 मध्ये रॉबर्ट बेरीने मँचेस्टरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 116 धावांत नऊ विकेट घेतल्या होत्या.