सातारा – नागरिकत्व दुरुस्ती कायदा व जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात जमात- ए- उल- हिंद व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सातारा शहरातून बुधवारी दुपारी तीन वाजता मोर्चा काढण्यात आला. सीएएच्या विरोधात आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या भव्य मोर्चात शहरातील बहुजन व मुस्लिम समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मोर्चानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन सादर करण्यात आले.
या मोर्चादरम्यान आंदोलक व पोलीस यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यावरुन जोरदार शाब्दिक चकमक झाली. हुतात्मा चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय तेथून कर्मवीर पथ पोवई नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी अडीच वाजता हुतात्मा चौकातून सुरू झालेला मोर्चा पोवई नाका ते पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना निवेदन देण्यात आले.
साडेतीन वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख व सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वारालगतचा मार्ग लोखंडी बॅरिकेडसने बंद करण्यात आला होता. तब्बल दोन हजार आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले, त्यावेळी त्या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली.
सीएए विधेयक संमत करणाऱ्या मोदी शासनाचा निषेध करण्यात आला. हा कायदा तातडीने मागे घेण्यात यावा, देशातील मुस्लिम बांधव याच मातीतील आहेत, त्यांना येथून कोणीच हटवू शकणार नाही, या कायद्याची सक्ती झाल्यास अशीच तीव्र आंदोलने होत राहतील, असा इशारा जमात ए -उल हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. महाराष्ट्रात ठिकाठिकाणी उग्र आंदोलन सुरू असल्याचे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. जेएनयू प्रकरणाचासुद्धा दोन्ही संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देऊन बॅनर झळकावण्यात आले.
“आंदोलन डे’मुळे पोलिसांची कसरत
साताऱ्यात मुस्लिम व बहुजन बांधवांनी काढलेल्या मोर्चावर पोलीस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते. जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी तब्बल चौदा शासकीय निमशासकीय संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर नारेबाजी केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था सांभाळताना पोलीसांची चांगलीच कसरत झाली.
सुरक्षेचा उपाय म्हणून आंदोलनस्थळी जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले होते. आंदोलक व पोलीस यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. आंदोलकांनी नरमाईचे धोरण घेतले व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन दिले. प्रशासनासाठीही बुधवारचा दिवस “आंदोलन डे” ठरला.