नागपूर – राज्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार होत आहे. नागपुरातही दिवसेंदिवस नवीन करोनाबाधितांची संख्या वाढतीच असल्याचे दिसते. काही दिवसांवर होळी सण आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागपुरातील लॉकडाऊन 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आला असून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याबाबत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी माहिती दिली.
याआधी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊन लागू असतानाही करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या 3 हजारांच्या पुढे सरकल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.
या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांसोबतही चर्चा करण्यात आली असून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येत आहे, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे.
नवीन निर्बंधानुसार, भाजीपाल, धान्य दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. ऑनलाइन रेस्टॉरंट सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार. हा लॉकडाऊन नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात वाढविण्यात आला आहे. ग्रामीणमधील जिथे रुग्णसंख्या कमी आहे अशा, उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्यांत दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे.
तर इतर तालुक्यात दुकाने सायंकाळी 6 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. दरम्यान, आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण लॉकडाऊनला यावेळी हरकत घेतली. जर संपूर्ण लॉकडाऊन केले तर गरिबांचे मोठं नुकसान होते, अनेकांचे रोजगार जातात, असे मुद्दे त्यांनी बैठकीत मांडले. नियम कडक करावेत, असे फडणवीस यांनी सुचविले.