पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले आहे. पुण्यात पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी राजकारणावर सडकून टीका केली आहे. खड्डे, वाहतूक कोंडी यावर भाष्य केले आहे. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या आणि बाकी गेलं तेल लावत, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “राज्यात खड्डे पहिल्यांदा पडलेले नाहीत. याआधीही खड्डे होते. मला आश्चर्य जनतेचे वाटतं. प्रत्येकवेळी प्रतिनिधी तुमच्यासमोर खड्डे आणि इतर मुद्दे उपस्थित करत असतात. काम मात्र करत नाहीत. पण पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच नेत्यांना जातीच्या, धर्माच्या मुद्द्यावरुन निवडून देतात. हे प्रश्न तसेच राहतील. जोपर्यंत लोकांचा राग मतपेटीमध्ये उतरत नाही तोपर्यंत हे खड्डे बुजणार नाहीत. कायदा नावाची गोष्ट राहिलेली नाही. निवडणुका कधी होतील तर आम्हाला वाटतील तेव्हा होणार अशी यांची भूमिका आहे.
तुम्ही कोणीही सरकारला प्रश्न विचारत नाही. प्रतिनिधींचं शहराकडे लक्ष नाही. आज पाच-पाच पुणे झाले आहेत. आपण आज जेथे आहोत त्याला तुम्ही हडपसर म्हणता. पण हडपर मागे गेलं. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या आणि बाकी गेलं तेल लावत अशी यांची मानसिकता आहे. तुम्ही त्यांना काही विचारत नाही, त्यामुळे सरकारचं लक्ष नाही. काही नियम असतात, लोकसंख्येनुसार किती हॉस्पिटल असावे, किती घरं असावी याची प्लॅनिंग असते. मुंबईतील ब्रिटिश काळातील प्लॅनिंग चांगलं होतं. असल्या गोष्टी आपल्याकडे होत नाहीत. जन्म झालाय म्हणून जगत आहोत,” असे राज ठाकरे म्हणाले.
आजपर्यंत मनसेने अनेक विषयांवर अनेक आंदोलनं केली आहेत. पण पदरी काय पडलं? याउलट सर्वाथाने नुकसान करणाऱ्यांना तुम्ही निवडून देता याचंच आश्चर्य वाटतं. पण तरीही पुण्यात आमची आंदोलनं सुरु आहेत. मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक येथेही आंदोलनं सुरु असून सरकारचे डोळे उघडतील अशी आशा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.