नवी दिल्ली: संसदेच्या चालू अधिवेशन कालावधीत वाढ करण्यात आली आहे. आता ते 7 ऑगस्टपर्यंत चालेल. अधिवेशन कालावधी वाढवण्याच्या निर्णयाची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरूवारी लोकसभेत दिली. सरकारकडून याआधीच अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे संकेत देण्यात आले होते.
मात्र, विरोधकांनी त्याला विरोध दर्शवला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत सरकारने अधिवेशन कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला. संसदेच्या अधिवेशनाचा प्रारंभ 17 जूनला झाला. आधीच्या वेळापत्रकानुसार ते 26 जुलैला समाप्त होणार होते. आता अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात आल्याने महत्वाचे कामकाज उरकण्याची आणखी संधी सरकारला उपलब्ध झाली आहे. मात्र, कालावधी वाढवण्याच्या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.