नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राला विदेशी शास्त्रज्ञांनी दिली भेट
नारायणगाव – आशियाई देशात आंबा व्यापार वाढीसाठी प्रयत्न व्हावे, असे आवाहन कृषीरत्न अनिल मेहर यांनी केले आहे. कृषी व किसान कल्याण मंत्रालय, वनस्पती संरक्षण संगरोध आणि संग्रह संचालनालय भारत सरकार यांच्यामार्फत विविध आशियाई देशातील अधिकाऱ्यांना आंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापन याविषयी पाच दिवसीय प्रशिक्षण मुंबई येथे सुरू आहे.
प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून शास्त्रीय प्रक्षेत्र भेटीसाठी भारतामधून नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या आंबा बागेच्या प्रक्षेत्राची तर हिवरे तर्फे नारायणगाव येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल शिंदे यांच्या अती घन पद्धतीने उभी केलेल्या आंबा बागेची निवड केली आहे. कृषी विज्ञान केंद्र येथील आंबा प्रक्षेत्रावर विविध आंबा जाती, आंब्यातील आयपीएम ट्रॅप, तसेच एकात्मिक कीड नियंत्रण म्युझियम दाखविण्यात आले.
तसेच त्यांच्या देशांमध्ये आंबा किड व रोगाच्या नियंत्रणाकरिता राबवत असलेल्या विविध उपायोजनाची माहिती ही त्यांच्याकडून घेण्यात आली. त्यामध्ये फळमाशी सापळे तसेच जैविक कीड रोग व्यवस्थापन याविषयी देवाणघेवाण करण्यात आली. भेटीदरम्यान उपस्थितांना आंबा पिकातील कीड रोगाचे व्यवस्थापन तसेच आंबा पिकामध्ये येणारी फळमाशी व तिचे पर्यावरण पूरक व्यवस्थापन आणि निर्यातक्षम आंबा उत्पादनाविषय मेहेर यांनी माहिती दिली.
यावेळी भारत सरकारचे वनस्पती संरक्षण सल्लागार डॉ. जे पी. सिंग, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ राहुल घाडगे, डॉ दत्तात्रय गावडे, योगेश यादव, फार्म मॅनेजर वैभव शिंदे, प्रगतशील शेतकरी विठ्ठल शिंदे आणि बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूतान, व्हेतनाम, इंडोनेशिया आदी 16 देशांतील 25 वनस्पती रोग शास्त्रामध्ये काम करणारे शास्त्रज्ञांना कृषी विज्ञान केंद्र येथील आंबा प्रक्षेत्रावर विविध आंबा जाती, आंब्यातील आयपीएम ट्रॅप, तसेच एकात्मिक कीड नियंत्रण म्युझियम दाखविण्यात आले. तसेच त्यांच्या देशांमध्ये आंबा किड व रोगाच्या नियंत्रणाकरिता राबवत असलेल्या उपायोजनाची माहिती घेण्यात आली.