नवी दिल्ली – केंद्र सरकारने गव्हाच्या आधारभूत किंमतीत प्रतिक्वींटल 40 रूपये इतकी वाढ केली आहे. तर मोहरीच्या किंमतीत प्रतिक्वींटल 400 रूपये वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गव्हाची आधारभूत किंमत आता प्रतिक्वींटल 2015 रूपये इतकी झाली असून मोहरीची किंमत प्रतिक्वींटल 5050 इतकी झाली आहे.
केंद्र सरकारतर्फे खरीब आणि रब्बी हंगामासाठी 23 पिकांसाठी हमी किंमत जाहीर केली जाते. गहु आणि मोहरी ही रब्बी हंगामाची महत्वाची पिके आहेत. गव्हाचा प्रति क्वींटल उत्त्पादन खर्च 1008 रूपये इतका आहे. सरकारने चालू वर्षात एमएसपीच्या दराने एकूण 43 दशलक्ष टन इतका गहु खरेदी केला आहे.
शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी डाळी (मसूर) आणि तेलबिया (मोहरी) च्या हमीभावात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारने 2022-23 या पिकासाठी मसूर आणि मोहरीच्या किमान आधारभूत किमतीत 400-400 रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे. हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये 130 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. गव्हाच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 40 रुपये वाढ करून 2015 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. बार्लीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 35 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.