मुंबई – ज्ञानोबा, तुकाराम आणि इतर संत परंपरा, फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारसरणी यामुळे जसे महाराष्ट्राला ओळखले जाते तसेच वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र म्हणूनही एक वेगळी ओळख आहे. या वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संतपीठ संदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वारकरी साहित्य परिषदेचे सचिव डॉ. सदानंद मोरे, पंढरपूर आणि आळंदीचे महाराज आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृह आयोजित करण्यात आलेल्या संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील विविध भागातील वारकरी उपस्थित होते. आजच्या या संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने वारकरी सपंद्रायाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील लोककलावंतांना कोविड काळात 5 हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कलाकारांची नोंदणी करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होत असून राज्यातील कलाकार आणि वारकरी संप्रदाय वर्गाची नोंद घेण्यात येईल. राज्यातील वृद्ध कलावंतांना देण्यात येणाऱ्या मानधनातही वाढ करण्यात येईल.
आज या निमित्ताने वारकरी संप्रदायाने शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य असून या संप्रदायाकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे.आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाने केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.