- प्रतिदिन 50 हजार प्रवासी घेतायेत लाभ
पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना जलद आणि स्वस्त प्रवास मिळावा यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने विविध प्रयोग केले जात आहेत. 25 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या अटल बस योजनेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातून पीएमपीला दिवसाला सुमारे अडीच लाखांचा महसूल मिळत आहे.
दिवसाला 40 ते 50 हजार प्रवासी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेला प्रवाशांचा असाच प्रतिसाद मिळत राहिला तर एका महिन्यात पीएमपीला 75 लाख रुपयांचा महसूल यामाध्यमातून मिळू शकतो. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने पूर्ण ताकदीनीसी ही योजना चालविणे गरजेचे आहे. चांगली सुविधा देणे गरजेचे आहे. प्रवाशांना महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी 5 रुपये तिकीट लागत असल्याने प्रवासी या बसला पसंती देत आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे.
शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर या बस सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटर प्रवास करता येत असल्याने प्रवाशांच्या पसंतीस ही योजना उतरली आहे. त्यामुळे “पीएमपी’ प्रशासनाला देखील यातून चांगला लाभ होत आहे. अटल बस सेवा योजना सुरू होऊन आठ दिवस झाले आहेत. पहिल्या दिवशी आठ हजार प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला.
मात्र आता प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असून प्रतिदिन 50 हजार प्रवासी या योजनेचा लाभ घेत आहेत. पुणे शहरात 9 मार्गांवर 99 बसेस तर, शहराच्या बाहेरील आगारांमध्ये 53 मार्गांवर 143 बसेसचे नियोजन असून, आजघडीला 50 टक्केच म्हणजे 72 बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांचा प्रतिसाद बघून येत्या काळात बसची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती “पीएमपी’चे वाहतूक व्यवस्थाक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे.
खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना फायदा
सध्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे “पीएमपी’ने अनलॉक होताच सुरू केलेल्या अटल योजनेचा प्रवाशांना चांगलाच फायदा झाला आहे. या योजनेमुळे प्रवाशांना पाच रुपयांत पाच किलोमीटर प्रवास करता येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी खासगी वाहनांपेक्षा “पीएमपी’ बसला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रवासी संख्या आठ हजार होती. परंतु अवघ्या आठ दिवसांतच एका दिवसाला प्रवाशांची संख्या पन्नास हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे ऐनसनासुदीमध्ये प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. त्यातून पीएमपी प्रशासनाला देखील चांगला लाभ होत आहे. त्यामुळे काही दिवसांतच पूर्ण क्षमतेने ही योजना सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.