सातारा – गोडोली येथील पानटपरीजळ सोमवारी रात्रीच्या वेळी किरकोळ कारणातून तामजाईनगर येथील बालाजी सोमनाथ रेड्डी (वय 24, रा. तामजाईनगर, सातारा) या युवकास मारहाण झाली होती. मंगळवारी तो घरातच निपचित पडल्याचे आढळून आल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत त्याच्या भावाने त्याला अज्ञाताने झालेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार दिली आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बालाजी रेड्डी पुणे येथे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. साताऱ्यात सुट्टीला आल्यावर तो मित्रासमवेत गोडोली येथील पोलीस चौकीपासून जवळच असलेल्या पानटपरीवर तो गप्पा मारायला जायचा. या पानटपटीसमोरच सोमवारी रात्री लोखंडी रॉडसारख्या हत्याराने डोक्यात मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली. त्याच्या इतर मित्रांनी हा वाद सोडवत बालाजीला त्याच्या घरी सोडले. मात्र, घरातच मंगळवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. बुधवारी त्याच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मारहाण झाली त्यादिवशी रात्री घरी आईने आणि त्याच्या भावाने इतका उशीर का झाला आणि डोक्याला काय लागले आहे, अशी विचारणा केली. त्यावर त्याने पडलो आहे, थोडसं लागले आहे असे सांगितले. ते सगळे झोपी गेली. मंगळवारी सकाळी आई व त्याचा भाऊ यांनी त्याची विचारपूस केली तेव्हा त्याने मी चांगला आहे, असे सांगितल्यावर ते दोघेही कामानिमित्ताने बाहेर पडले. सांयकाळी कामावरुन आल्यानंतर बालाजीच्या आईला बालाजी निपचित पडलेला दिसला. त्याला मंगळवारी रात्री जिल्हा रुग्णालयात नेले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तिथे शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.