प्रभात वृत्तसेवा, पुणे, दि. 29 –गेल्या काही वर्षांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे देशातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरात वीज पोहोचली आहे. सर्व वीजग्राहकांसाठी मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध आहे व देशाच्या प्रगतीचे चक्र देखील विजेमुळेच वेगाने फिरत आहे. त्यामुळे “उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य’ हा ऊर्जा क्षेत्रातील महाक्रांतीचा महोत्सव आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालय, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय तसेच महावितरण, महानिर्मिती व महापारेषण यांच्या संयुक्त सहकार्याने “आजादी का अमृतमहोत्सवा’निमित्त ऊर्जा महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार (महावितरण) व राजेंद्र गायकवाड (महापारेषण), पॉवर ग्रीडचे महाव्यवस्थापक एच. लल्लीयनसियामा, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, “सीओईपी’चे उपसंचालक मनोज राठोड उपस्थित होते.
या कार्यक्रमात पुणे जिल्हयातील विविध विद्युत योजनांचे लाभार्थी संतोष देशपांडे (पानशेत), संतोष कोकरे व विलास मोरे (ता. वेल्हे), रामचंद्र मोहोळ (ता. मुळशी), भास्कर कसबे (ता. हवेली), अनिल मेहर (ता. खेड), नागेश रणपिसे (राजगुरुनगर) आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजेंद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले तर महेश कारंडे व भक्ती जोशी यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.
यावेळी ऊर्जा खात्यांच्या विविध योजना व उपलब्धीबाबत लघुचित्रफिती दाखविण्यात आल्या, तर पथनाट्यांद्वारे या विभागाच्या विविध योजनांचा जागर करण्यात आला.