पोलीस अधिकारी कारागृहांना भेट देत नसल्याचा घरचा आहेर
पुणे – येरवडा कारागृहातील कैद्यांच्या खुनी हल्ल्यावरून कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, पोलीस कारागृहांना भेटच देत नसल्याचा आरोप तुरुंग अतिरिक्त महासंचालक यांनी केला आहे. अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांनी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांच्या समोरच हा आरोप केल्याने गृह विभागातील बेदिली चव्हाट्यावर आली आहे.
पुण्यातील पोलीस संशोधन केंद्राच्या कॉन्फरन्स हॉलच्या लोकार्पण सोहळ्यात हा प्रकार घडला आहे. यावेळी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, तुरुंग अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद, पुणे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
राज्याचे हे पोलीस संशोधन केंद्र असून याठिकाणी गुन्ह्यांमध्ये पोलिसांना आवश्यक असणाऱ्या कामाविषयी संशोधन केले जाते. तसेच खासगी व्यक्तीही याठिकाणी संशोधन करू शकतो, अशा या एकमेव केंद्राचे लोकार्पण जैस्वाल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पत्रकार परिषदेत रामानंद यांनी कारागृह नियमावलीनुसार पोलिसांनी कारागृहात भेट देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पीएसआय ते डीसीपीपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी कारागृहाला भेट दिली पाहिजे. त्यामुळे कैद्यांवर वचक राहू शकतो. मात्र, जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी आणि इतर विभागाचे अधिकारी येतात.
मात्र, पोलीसच कारागृहात येण्याचे टाळत असल्याचा आरोप रामानंद यांनी केला आहे. या आरोपानंतर पोलीस महासंचालकांनी त्यांच्याकडे पाहण्याचे टाळत तपास चौकशी समितीकडे आहे. अहवालानंतर कारवाई करू आणि भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
सायबर गुन्ह्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी देणार
देशासह राज्यात सायबरचे गुन्हे वाढत असून याबाबत महाराष्ट्र पोलीस मोठ्या कुशलतेने काम करत आहे. यामध्ये लवकरच कुशल कर्मचारी यांची जादाची कुमक नियुक्त करून सायबर गुन्हे उघडकीस आणले जातील. याकरिता विशेष ट्रेनिंग या कर्मचाऱ्यांना दिले असून याचा फायदा होणार असल्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी सांगितले