कोपरगाव – कोपरगाव तालुक्याच्या आजूबाजूच्या तालुक्यांत करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच येवला शहरात बुधवारी (दि.6) सकाळपर्यंत 25 बाधित रुग्ण आढळल्याने कोपरगाकरांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे येवला ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्याच ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात काम करणारी एक महिला कर्मचारी राहात आहे. ती दररोज येवल्याहून कोपरगावला येत असल्याने कोपरगावात करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या दररोज ही महिला कर्मचारी येवल्याहून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात कामासाठी येते. शिवाय कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात ती रुग्णांचे केस पेपर काढण्याचे काम करते. हा केसपेपर अनेक डॉक्टर व कर्मचारी हाताळतात. तसेच सध्या तालुक्यातील नागरीक, मजूर परराज्यात व जिल्ह्यात आपल्या गावी जाण्यासाठी कोपरगाव रुग्णालयातून वैद्यकीय दाखले घेण्यासाठी गर्दी करत आहेत. मागील तीन दिवसांत 500 पेक्षा जास्त नागरिकांना वैद्यकीय दाखले देण्यात आले आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर रात्रंदिवस नागरिकांची तपासणी करुन वैद्यकीय दाखले देत आहेत.
मात्र दाखले काढण्यासाठी नागरिकांची रुग्णालयात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोपरगाव शहराला करोना संसर्गाचा धोका वाढला आहे. रुग्णालयात वाढलेली गर्दी आणि येवल्यातून येणारे कर्मचारी, नागरीक यांच्यामुळे सुरक्षित असलेला कोपरगाव तालुका करोनाबाधित होण्यास वेळ लागणार नाही. दरम्यान, शहरात तीन दिवस भाजीपाला, फळांसह अत्यावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. भाजीपाला, फळे व इतर साहित्य, वस्तूंची विक्री करण्यासाठी शेजारच्या तालुक्यासह मालेगाव येथून छोटे-मोठे व्यापारी येत असतात. कोपरगाव तालुक्यातील अनेक फळबागा मालेगावच्या बागवानांनी खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळेच बाधित क्षेत्रातील नागरिकांची ये-जा कोपरगावमध्ये होत आहे.
तालुक्याच्या सीमा कितीही बंद केल्या, तरी चोरट्या मार्गाने घुसखोरी सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी येवला तालुक्यात एकही करोनाबाधित रुग्ण नव्हता. मात्र एक महिला मालेगावला गेली. तेथून करोनाचा वानवळा येवल्यात घेवून आली. त्यानंतर तब्बल 25 लोक बाधित झाले. मालेगावात तर बाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. तेथील अनेकांचे नातेवाईक कोपरगावात व येवल्यात आहेत. अशातच आरोग्य विभागातील ही महिला कर्मचारी बाधित रुग्णांच्या क्षेत्रातून कोपरगावात येत असल्याने कोपरगावचा धोका अधिक वाढला आहे.