शिरूर : विस्कटलेली आर्थिक घडी भरून काढण्यासाठी राज्यातील दारूच्या दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे दारूच्या दुकानांपुढे तळीरामांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. सरकारच्या निर्णयामुळे महिला वर्गामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. घरगुती हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचार याच्यात यामुळे वाढ होणार आहे.
दारूची दुकाने सुरू झाली आणि तळीरामांनी एकच गर्दी केली. भर उन्हात माणूस उभा राहू शकत नाही, तिथे हे तळीराम अगदी शिस्तीत उभे असल्याचे दिसून आले. सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून अन्नधान्य किट घेणारे अनेकजण दारू घेण्यासाठी रांगेत दिसत होते. नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आणखी काही दिवस दारू दुकाने बंद ठेवणे गरजेचे आहे. घरात भांडणे सुरू झाल्याच्या तक्रारी आहेत. यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने दारू दुकाने सुरू केल्याचा निषेध करून, जोपर्यंत लॉक डाऊन सुरू आहे तोपर्यंत ही दुकाने बंद ठेवावी, याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांना दिल्याचे सचिव नम्रता गवारी, सदस्या पुष्पा जाधव यांनी सांगितले.
दारूच्या दुकानात जाणाऱ्यांवर शिक्के मारा. त्यांना सरकार किंवा इतर कोणीही फुकट अन्न, फुकट रेशन आणि इतर किट देऊ नये. दारूसाठी पैसे असतील तर मग मोफत किराणा कशासाठी? दारू पिऊन तळीराम घरात पत्नी, मुलांशी भांडण करणार, त्यामुळे महिला अत्याचारात भर पडणार आहे.
राणी कर्डिले,
अध्यक्ष, रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्था शिरूर
शिरूर तालुक्यात वाइन शॉप सुरू झाले असून, येथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यामुळे दारू पिऊन तळीराम घरातील महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास देणार असून, महिला अत्याचारात यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच कौटुंबिक कलहही वाढणार आहे.
शोभना पाचंगे
अध्यक्ष, महिला दक्षता समिती शिरूर