पाझर तलावही कोरडा; टॅंकरने होतोय पाणीपुरवठा ः ठोस पाणीयोजना राबविण्याची मागणी
कोंढवा – पूर्व हवेली भागातील गावांतील पाझर तलाव, बंधारे कोरडे पडून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनीही तळ गाठला असून शासनाकडून कोणतीही ठोस पाणीयोजना राबविली जात नसल्याने येथील नागरिकांवर “पाणी पाणी’ करण्याची वेळ आली आहे. काही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून तो खूपच अपुरा व खर्चिक असल्याने ग्रामपंचायतींवर मोठा ताण येत आहे. तरी पालिका व राज्य शासनाने या गावांसाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना राबवून पाणीसमस्या कायमची सोडवावी, अशी मागणी या भागातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.
पूर्व हवेली तालुक्यातील वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, औताडेवाडी, वडकी, उरुळी देवाची, फुरसुंगीसह पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील नागरिक बहुतांश मूलभूत सुविधांपासून दूर आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, रस्त्यांची दुरवस्था, कचरा समस्या, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी अशा एक ना अनेक समस्यांनी या परिसरातील नागरिक त्रासले आहेत. “मुकी बिचारी कुणीही हाका’ अशीच अवस्था येथील नागरिकांची झाली आहे.यावर्षी मुळातच पाऊस कमी पडल्याने या भागांतील एकही पाझर तलाव पाण्याने भरला नव्हता. ज्या तलावांमध्ये थोडे-फार पाणी साचले होते तेही संपून तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायतींना मोठी कसरत करावी लागत असून टॅंकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा खुपच अपुरा व खर्चिक होत आहे.
नागरिकांना रात्री-अपरात्री पाणी मिळविण्यासाठी सार्वजनिक नळावर रांगा लावाव्या लागत आहेत. नळालाही पुरेसे पाणी येत नाही, या भागातील विहीरी, तलाव, कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. महापालिकेच्या उंबरठ्यावरील पूर्व हवेली तालुक्यातील ग्रामपंचायती असूनही तेथील सर्वसामान्य नागरिकांना मात्र पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. ऊंड्री, फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे महापालिकेत समाविष्ट होऊन दीड वर्षे उलटली तरीही कोणत्याच समस्या सुटत नाहीत. येथील पाणीसमस्या गंभीर झाली आहे. काही गावांमध्ये दिवसाआड तर काही गावांमध्ये 4 ते 15 दिवसांतून एकदा पाणी येते. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील नागरिकांना बारमाही पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. याकडे राज्य शासन व पालिका प्रशासन लक्ष देईल का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
फुरसुंगी-उरुळी देवाची व इतर भागांसाठी मंजुर झालेली महत्त्वाकांक्षी पाणीयोजना अजूनही अंमलात आलेली नाही. या भागातील सर्व नैसर्गिक जलस्त्रोत आटले असून पाझर तलाव, विहीरी कोरड्या पडल्या आहेत. ग्रांमपंचायत व पालिकेकडून टॅंकरद्वारे येथील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. तरी शासनाने या भागासाठी ठोस पाणीयोजना राबविण्याची मागणी हवेली पंचायत समितीचे उपसभापती सचिन घुले-पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप बांदल, उंड्रीचे सरपंच निवृत्ती बांदल, नितीन घुले, लक्ष्मण बांदल, माजी सरपंच संजय जाधव, हांडेवाडीचे अशोक न्हावले, उरुळीचे सरपंच उल्हास शेवाळे, भगवान भाडळे, गणेश शेवाळे, गोविंद हांडे, सचिन हांडे, प्रवीण आबनावे यांनी केली आहे.