प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 16 -झेब्रा क्रॉसिंग, पादचारी सिग्नलची दुरवस्था, अतिक्रमणे आणि त्यातच रस्त्यावर असलेली गर्दी यामुळे शहरात पादचारी वाऱ्यावरच असल्याचे चित्र आहे. यातूनच पादचाऱ्यांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी सहा महिन्यांत 48 पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. महापालिका, पोलीस यंत्रणा आणखी किती मृत्यूची वाट पाहत आहे, असा सवाल पुणेकर करत आहेत.
सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट (एसपीटीएम) संस्थेने माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीतून हा धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2016-19 या काळात पादचारी मृत्यू 87 वरून 64 पर्यंत खाली आले होते. 2020 या करोना वर्षात हे प्रमाण 34 वर आले होते. परंतु 2021 मध्ये हा आकडा 84 वर झेपावला असून, पादचाऱ्यांचा वाली कोण आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट ही संस्था गेली अनेक वर्षे पुण्यातील अपघाती मृत्यूंची वार्षिक आकडेवारी जमा करून त्याचा अभ्यास करत आहे. याही वर्षी “एसपीटीएम’ने माहिती आधिकारात एकूण अपघाती मृत्यू झालेली आकडेवारी मागितली होती. यात एकूण मृत्यूपैकी सुमारे 50 ते 55 टक्के दुचाकीस्वारांचे, तर सुमारे 30 ते 35 टक्के पादचाऱ्यांचे झाले असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. सिग्नल असलेले चौक हे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी तुलनेने सुरक्षित असतात; परंतु तेथेही झेब्रा पट्ट्या आणि पादचारी सिग्नल यांची अवस्था वाईट आहे.
“एसपीटीएम’ने गेली दोन वर्षे केलेल्या पाहणीत असे दिसले आहे, की फक्त सुमारे 30 ते 50 टक्के चौकांमधील झेब्रा पट्ट्या ठीकठाक आहेत. पादचाऱ्यांच्या सिग्नलची अवस्था तर याहून वाईट आहे. अशा सिग्नलपैकी फक्त 15 टक्के दिवे सुरू आहेत. सगळे पादचारी सिग्नल सुरू असलेले चौक अभावानेच सापडतील, असे संस्थेने म्हटले आहे.
दुष्काळात तेरावा महिना म्हणजे, 2021-22 मध्ये मनपाकडे पादचारी सिग्नल दुरुस्त करण्यासाठी 1.5 कोटीची तरतूद होती. जी त्यांनी पूर्णपणे वाया घालवली. सुदैवाने ह्या वर्षीही पादचारी सिग्नलसाठी मनपाने काही आर्थिक तरतूद केली आहे. तिचा वापर करून सगळ्या शहरातील पादचारी सिग्नल दुरुस्त होतील, अशी आशा करूया.
-हर्षद अभ्यंकर, संचालक, “एसपीटीएम’