मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शिधाधारकांना १०० रुपयांमध्ये दिवाळी फराळासाठी चार वस्तू देण्याची घोषणा केली. मात्र, दिवाळीला २ दिवस शिल्लक राहिले असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये या वस्तू वितरणासाठी पोहचल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची निराशा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांना “एका रात्रीत ५० आमदार गुजरातहून गुवाहाटीला पोहचतात, मग शिधा पोहचायला उशीर का?” असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे.
रविंद्र चव्हाण यांना “एका रात्रीत ५० आमदार गुजरातहून गुवाहाटीला पोहचू शकतात, पण जो शिधा सर्वसामान्यांच्या घरात पोहचणं गरजेचं आहे, दिवाळीच्या आधी तो फराळ होणं गरजेचं आहे तो पोहचायला चार ते पाच दिवस लागतात. हा विरोधाभास नाही का?” असे विचारण्यात आल्यानंतर रविंद्र चव्हाण म्हणाले, “५० आमदार त्यांच्या मर्जीने गेलेत हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही गरिबांसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला. या सर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करायला हवा, अशी माझी विनंती आहे. सरकार देण्याच्या मानसिकतेत आहे हे अधोरेखित करणं गरजेचं आहे.”असे त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी, “जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे यातील किमान ५० टक्के वस्तू पोहचतील यासाठी आम्ही शासन म्हणून पूर्ण ताकद लावली आहे. आज रात्रीपर्यंत सर्व ठिकाणी शिधा पोहचेल.” असे म्हटले. तसेच काळाबाजार, साठेबाजीवर बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले, “यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने अतीशय सक्षमपणे सगळी यंत्रणा बरोबर राबेल यासाठी प्रयत्न करावेत असं सांगितलं आहे. हा शिधा आधारच्या मदतीनेच दिला जाणार आहे. त्यावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचं नियंत्रण असणार आहे. त्यामुळे काळाबाजार किंवा साठेबाजी होणार नाही.”