करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील बोरुडे तलावात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या संदिप व बापू अकोलकर या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संदीप दत्तू अकोलकर (वय २९) व बाप्पू दत्तू अकोलकर (वय २७) हे सख्ये भाउ त्यांची शेती असलेल्या हाडे वस्ती जवळील बोरुडे तलावालगत असलेल्या भागात मेंढया चारण्यासाठी गेले होते. मेंढ्या काही वेळ चारून झाल्यानंतर पाणी पाजण्यासाठी तलावामध्ये डबक्यात असलेल्या पाण्यावर ते गेले. मेंढ्यांचे पाणी पिऊन झालेनंतर संदीप पाण्यात उतरून मेंढ्या धुऊ लागला. मेंढ्या धूत असतानाच संदीपचा पाय खोलात गेला. त्याने लहान भाऊ बापूला आवाज दिला. बापूने हात दिला व संदीपला वर काढू लागला. या ओढाताणीत बापूच पाण्यात गेला. दोघेही पाण्यात पडले.
दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. दोघेही पाण्यात पडल्याचे लांबूनच संदीपच्या पत्नी सोनालीने पाहिले व तिने आरडाओरड केली. त्यानंतर नामदेव अकोलकर , दादा मुखेकर यांनी या दोघा भावांना पाण्यातून बाहेर काढले परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. दोघांही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथे नेण्यात आले आहेत.
दत्तू बाबू अकोलकर हे अत्यंत गरीब कुटुंब आहे. मजुरी व मेंढ्या पाळणे यावरच त्यांचा उदरनिर्वाह करत होते. संदीप यास एक तीन महिन्याचा मुलगा आहे,तर बाप्पू अकोलकर हा अविवाहित होता. एकाच कुटुंबातील सख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने करंजी गावात शोककळा पसरली आहे