लातूर – कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे घडली आहे. सुषमा संजय राठोड, अरूणा गंगाधर राठोड (रा. मोजमाबाद, तालुका पालम), राधाबाई धोंडिबा आडे, काजल धोंडिबा आडे, दीक्षा धोंडिबा आडे (रामपूर तांडा, तालुका पालम) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणाची किनगाव पोलिसात नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत हे मजूर असून ते अहमदपूर तालुक्यातील सिद्धी शुगर साखर कारखाना येथे उसतोडीसाठी आले होते. या घटनेत एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलींचा समावेश आहे. मयत सर्व कपडे धुण्यासाठी तलावावर आल्या होत्या. एका महिलेचा पाय घसरला आणि ती तलावात बुडत असताना इतरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. यातच सर्वजण बुडाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच किनगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.