दौंड -दौंड तालुक्यात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या भागातून सुमारे 2 हजार 890 नागरिक दाखल झाले झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाद्वारे त्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दौंड तालुक्यात विलगीकरणाचा सल्ला दिलेले दोन रुग्ण असून त्यांना पुणे येथील नायडू रुग्णालयामध्ये पाठविले होते; मात्र त्यांना दाखल करून घेतले नाही. परंतु खबरदारीसाठी म्हणून त्यांना गुरुवारी (दि. 26) खबरदारीचे उपाय म्हणून पुन्हा पाठवण्यात आले तेव्हा त्यांना दाखल करून घेतले असून त्यांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दौंड तहसीलदार कार्यालयात बुधवारी (दि. 25) शीरा बैठक घेण्यात आली, त्यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या बैठकीत “सोशल डिस्टन्सिंग’चे (एकमेकांपासून दूर) चित्र दिसून आले.
या बैठकीस तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ, रासगे, ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, दौंड पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, यवत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार कुल म्हणाले की, करोना विषाणूच्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाद्वारे अधिक तपासणी कीट उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर दूध पुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पास देण्यात येणार असून यामुळे दुधाची वाहतूक सुरू राहील. तसेच शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीला डीझेलसाठी देखील व्यवस्था करून त्यांचे पास संबंधित गावाचे मंडल अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहेत.
तालुक्यातील गरीब कुटुंब किंवा स्वस्त धान्य दुकानांवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना धान्य घरपोच मिळावे यासाठी त्यांना मदत करण्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी तालुक्यातील रेशन दुकानदारांना विनंती केली असून या संबंधी पुढील व्यवस्था करण्यात येत आहे.