जशपूर – लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलकांवर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने गाडी घातल्याची घटना ताजी असताना अशीच घटना आता छत्तीसगढमदून समोर आली आहे. जशपूर येथे देवीच्या मिरवणुकीत एका नशेखोराने गाडी घातली. या भयंकर घटनेत चार जणांचा चिरडून मृत्यू झाला तर 16 हून अधिक जण जखमी झाली आहे.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो भयंकर आहे. जशपूर येथे ही मिरवणूक सुरू असताना बबलू विश्वकर्मा (21) व शिशूपाल साहू (26) हे दोघे लाल रंगाच्या झायलो गाडूतून गांजा घेऊन जात होते. ते दोघेही नशेत तर्राट होते. त्यांनी रस्त्यावरून जात असलेल्या मिरवणुकीत गाडी घातली.
दरम्यान गावकऱ्यांनी गाडीचा पाठलाग केला व गाडी अडवली. गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिशूपाल व बबलू यांना अटक केली आहे.
जशपूर घटना ही फारच दुखदायक व क्लेषदायक आहे. या घटनेतील आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल’, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले.