मंचर -नागरिकांनी सर्पदंश झाल्यावर वेळकाढूपणा न करता तातडीने वैद्यकीय उपचार घेतल्यास जीवदान मिळण्यास मदत होते, त्यामुळे नागरिकांनी तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. पल्लवी राऊत यांनी केले. बोरघर (ता. आंबेगाव) येथे शाश्वत
संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. सदानंद राऊत आणि डॉ. पल्लवी राऊत यांनी सर्पदंश लक्षणे, प्रथमोपचार, उपचार याबाबत मार्गदर्शन केले. शून्य सर्पदंश प्रकल्प हा माहितीपट यावेळी दाखविण्यात आला, तसेच जनजागृतीसाठी पोस्टरचे व स्मार्ट बॅंडेजचे वाटप करण्यात आले. गावातील आरोग्य कार्यकर्त्या व 300 हुन अधिक महिला यावेळी उपस्थित होत्या.
अनेक महिलांनी प्रश्न विचारून सर्पदंशाविषयी असलेल्या अंधश्रद्धा व उपचाराबद्दल माहिती जाणून घेतली. कार्यक्रमासाठी शाश्वत संस्था मंचरचे उपाध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त सुरेश राजवाडे,अशोक आढाव, विकास गाडे, व्यवस्थापक प्रतिभा तांबे, विश्वस्त व आरोग्य समन्वयक सुलोचना गवारी, सुदाम चपटे,शांताराम गुंजाळ, देवराम आसवले, शंकर लांघी, संजीव आसवले, सर्व आरोग्य महिला उपस्थित होते.
आदिवासी भागात सर्पदंश झाल्यावर नागरिक मंदिरात जाऊन अंगारे-धुपारे करतात. यावेळी विष अंगात भिनल्याने नागरिकांचा मृत्यू होतो.त्याऐवजी सर्पदंश झाल्यावर नागरिकांनी तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन सर्प व विषबाधा तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी केले.