पाटणा : सुमारे 50 करोनाबाधित भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्यामुळे भारत-नेपाळ सीमेलगत असणाऱ्या बिहारच्या भागांमधील गस्त वाढवण्यात आली आहे. करोना फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर बिहारने इतर राज्यांशी असलेल्या सीमा बंद केल्या.
त्याशिवाय, नेपाळलगतची सीमाही सील करण्यात आली. अशातच सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले आहे. त्या पत्रात शस्त्रास्त्रे आणि बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या एका नेपाळच्या नागरिकाशी संबंधित कटाचा उल्लेख आहे. भारतात करोनाचा फैलाव करण्याचा तो कट असल्याचे पत्रातून सूचित होत आहे.
त्या पत्राच्या सत्यतेची पुष्टी होऊ शकलेली नाही. तसे असले तरी ते पत्र भारतीय यंत्रणांनी गांभीर्याने घेतले आहे. मागील महिन्यातील दिल्लीतील तबलिगी जमातच्या मेळाव्याला हजेरी लावणाऱ्या अनेक सदस्यांना करोनाची बाधा झाली. त्यातील काही सदस्य बिहारला आणि नेपाळलाही गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संबंधित पत्राचे महत्व वाढले आहे. त्यातून नेपाळ सीमेवरून भारतात घुसखोरी होणार नाही याची निश्चिती सुरक्षा यंत्रणांकडून केली जात आहे.