वडूज -भारतीय जनता पक्ष आता कुठेही हरू शकत नाही. एका कार्यकर्त्याने बूथ व सात घरे सांभाळून ठेवल्यास 2024 साली भाजप नंबर एकचा पक्ष असेल, असा विश्वास पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झल्याबद्दल आ. जयकुमार गोरे यांचा वडूज येथे सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष विकल्प शहा, ज्येष्ठ नेते विश्वासराव काळे, शहराधक्ष प्रदीप शेटे, नगरसेवक अनिल माळी, जयवंत पाटील, सोमनाथ जाधव, अमोल गोडसे, वचन शहा, प्रशांत गोडसे, दत्तू पाटील, नरसिंह जाधव, सुधीर गोडसे, शशिकांत पाटोळे, संजय काळे, शशी काळे, सतीश जगदाळे, नगरसेविका रेखा माळी, रेश्मा बनसोडे, माजी उपनराध्यक्ष किशोरी पाटील, जयसिंग जाधव, रामभाऊ पाटील, गणेश गोडसे, बनाजी पाटोळे, कृणाल गडांकुश, काका बनसोडे, नीलेश किरपे, विक्रम रोमण, प्रल्हाद निकम, आकाश जाधव, चंद्रकांत कोकाटे, राहुल लोहार, धनाजी चव्हाण उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, माण-खटाव मतदारसंघात 14 वर्षांमध्ये मी तीन वेळा कसा निवडून आलो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सर्वांची फौज एका बाजूला व दुसऱ्या बाजूला वानरसेना अशी लढत झाली आहे. तुमची ताकद व आशीर्वादाने यश मिळाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांत पाटील यांनी सन्मान केला.
मंत्र्यांपेक्षा भाजपमध्ये जिल्हाध्यक्षाला मानाचे स्थान आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ताकदीने काम करत असून, जिल्ह्यात भाजप एक नंबरचा पक्ष करणार आहे. या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर करोना आला. एससी, ओबीसी, मराठा समाजाला दिलेले आरक्षण गेले. एसटीचा संप झाला. त्यामुळे हे सरकार अपशकुनी आहे.
…तेच भ्रष्टाचारी निघाले
सत्कार सोहळे मला फारसे आवडत नाहीत; पण आमदारापेक्षा जास्त सत्कार भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून होत आहेत. फडणवीस सरकारने केलेल्या कामांचे उद्घाटन हे राज्य सरकार करत आहे. करोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला लस, दहा पट व्हेंटिलेटर दिले; परंतु सकाळी लस मिळत नाही अन् संध्याकाळी राज्य लसीकरणात एक नंबर असल्याचे हे सरकार सांगत होते. ज्यांना अंकुश ठेवण्याचे काम दिले, तेच भ्रष्टाचारी निघाले, असेही आ. गोरे म्हणाले.