इस्लामाबाद – भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील मतभेद मिटवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर टिव्हीवर वादविवाद करण्याची तयारी दर्शवली आहे. रशियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खान यांनी ही तयारी दर्शवली आहे. ही चर्चा भारतीय उपखंडातील एक अब्जपेक्षाही अधिक लोकांच्या फायद्याची ठरेल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. मात्र या वृत्तावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
“दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकणार नाही.’ असे भारताने अलिकडेच पुन्हा एकदा पाकिस्तानला स्पषटपणे सांगितलेले आहे. मात्र दहशतवादी कारवाया पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे काम आहे, असे म्हणून पाकिस्तानने ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यापासूनच भारताने पाकिस्तानला दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची सूचना केली आहे. त्यानंतर 2016 मध्ये झालेला पठाणकोट हल्ला आणि 2019 मधील पुलवामा हल्ल्यातील दोषींवरही कारवाईची मागणी भारताकडून केली जात आहे. पठाणकोटच्या हल्ल्यानंत भारताने सर्जिकल स्ट्राईक करून बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. अशाप्रकारे दहशतवाद्यांवर कारवाई केल्यानंतरच चर्चा केली जाऊ शकेल, असे भारताने पाकिस्तानला सांगितले आहे.
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आणि अफगाणिस्तानच्या हस्तक्षेपामुळे पाकिस्तानच्या व्यापाराची संधी मर्यादित झाली असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले होते. त्यामुळे भारताबरोबरचे व्यापारी संबंध पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी सुरू केलेली ही चाचपणी आहे.